वाघोली – येथे विद्युत कंपनीच्या वाढत्या ग्राहकांबरोबरच तक्रारी देखील वाढल्या आहेत. अनेक रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार येत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. रोहित्रांची क्षमता बघून ग्राहकांना वीज जोडणी देणे गरजेचे असताना वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून वीज जोडणी देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे, कमीजास्त वीज दाबाने पुरवठा होणे, रोहित्र जळणे, विद्युत उपकरणे जळणे आदि प्रकार वाढलेले दिसून येत आहेत.
वाघोली येथे महावितरण विद्युत कंपनीचे सहायक अभियंता कार्यालय असून एक सहायक अभियंता व 14 कर्मचारी सद्यःस्थितीत कार्यरत आहेत. वाघोलीत साधारणतः 58 ते 60 हजारांच्या जवळ ग्राहक संख्या पोहोचल्यामुळे त्याप्रमाणात विद्युत क्षमता देखील वाढवणे गरजेचे आहे. वाढती ग्राहक संख्या लक्षात घेता दर्जेदार व वेळेत सेवा देण्यासाठी वाघोली येथे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कर्मचारी संख्येतही वाढ करणे
आवश्यक आहे.
हवेली-शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी एक वर्षापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी वाघोली येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय 1 एप्रिलला कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केली होती.
तक्रारींत वाढ
मीटर बिलासह अन्य तक्रारींतही ग्राहकांकडून वाढल्या आहेत. 15 दिवसांपूर्वीच मांजरी येथे लाइनमन यांनी रोहित्र आणि वीज जोडणीप्रकरणी केलेल्या गैरप्रकाराची लेखी तक्रार स्थानिक नागरिक सोमनाथ आव्हाळे यांनी वरिष्ठांकडे केली होती. येथील एका प्लॉटमध्ये एक रोहित्र गेले सहा महिनापासून तर दोन रोहित्र माहेर संस्था रस्त्यावर एक वर्षापासून पडून असल्याचे आव्हाळे यांनी विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आव्हाळे यांच्या तक्रारी नंतर विद्युत कंपनीच्या एका पथकाने पाहणी करून संबधित लाइनमन यांची तात्काळ बदली करण्यात आली.
एक वर्षापासून रोहित्रे या ठिकाणी ठेवण्यामागे काय उद्देश होता? हे तपासणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आव्हाळे यांनी लाइनमन यांच्या गैरकारभाराबाबत लेखी तक्रारीमध्ये अनेक आरोप केले आहेत. लाइनमनची तात्काळ बदली करून तो दोषी असल्याचे विद्युत कंपनीच्या पथकाने सिद्धच केले आहे. पुणे ग्रामीण मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
इच्छाशक्तीचा अभाव
लोहगाव रोड, फुलमळा, बकोरी रोड, वाघोली या चार ठिकाणी कनिष्ठ अभियंता कार्यालये व एक उपविभागीय कार्यालय करण्याबाबत प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला होता. उपविभागीय कार्यालयासाठी जागेचे शोधाशोध करायची गरज नसून, वाघोली येथे बकोरी रस्त्यावर प्रशस्त अशी 13 गुंठ्याचे नवीन कार्यालयाची इमारत तयार आहे. ग्राहकांना चांगली सेवा द्यायची असेल तर लवकरच उपविभागीय कार्यालय कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
तीस हजार ग्राहकांसाठी एक उपविभागीय कार्यालय
हडपसर ग्रामीण उपविभागीय कार्यालयांतर्गत वाघोली, पेरणे, फुरसुंगी आणि उरूळी देवाची अशी चार शाखा कार्यालये आहेत. यामध्ये वाघोलीत साधारणतः 58 ते 60 हजार ग्राहक आहेत. खरे तर 30 हजार ग्राहकांसाठी एक उपविभागीय कार्यालय असणे गरजेचे आहे; मात्र वाघोली येथील एकाच सहायक अभियंता कार्यालयामार्फत 58 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांचा कारभार चालतो. त्यामुळे फुरसुंगी, हडपसर येथे कामासाठी चकरा माराव्या लागतात. आर्थिक, मानसिक त्रासाबरोबरच ग्राहकांचा वेळ वाया जातो.