हिंजवडी, दि. 9 (वार्ताहर) – हिंजवडी गावठाणातून छत्रपती शिवाजी चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या परिसरातून वाहने चालवताना जपून आणि सावकाश प्रवास करणे गरजेचे आहे. अन्यथा वाहनाला अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंजवडीतील रस्त्याची दुरुस्ती हद्दीच्या वादात रखडली आहे. परंतु सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक वेठीस धरला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हिंजवडी येथील गावठाणातील रस्ता हद्दीच्या वादामुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे. हद्द कुणाचीही असो ग्रामस्थांसह आयटीयन्स प्रवाशांची वर्दळ असलेल्या या मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हिंजवडी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान हा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने हिंजवडीकरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने हिंजवडीकरांना दिल्या. हिंजवडीचे सरपंच मच्छिंद्र हुलावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुळशी तालुका उपाध्यक्ष विलास साखरे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी हा रस्ता बांधकाम विभागाकडे असल्याचे सूचित केले.
मागील काही वर्षांपूर्वी महापालिकेने भूमकर चौक ते हिंजवडी गावठाणात प्रवेश होतो. एवढ्या जागेचा रस्ता रुंदीकरण करून पक्के डांबरीकरण केला असून, गावठाणातील सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता अतिक्रमणामुळे तसाच ठेवला होता. त्यामुळे हा रस्ता हद्दीच्या वादात रखडला होता. महापालिका हा रस्ता पूर्ण करणार असा नागरिकांचा भ्रम होता. मात्र, आता अडसर दूर झाला आहे. हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग नसल्यामुळे त्याची सद्य:स्थितीत दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
खड्ड्यांमुळे दुचाकींना अपघात
रस्ता उखडून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र खडी पसरली आहे. खड्ड्यांत पाणी साठत असल्याने दुचाकी चालकांना तसेच परिसरात नवीन आलेल्या वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दररोज येथे लहान मोठे अपघात घडत आहेत. हिंजवडीच्या यात्रेपासून सर्वच सार्वजनिक मोठमोठे कार्यक्रम या रस्त्यवर पार पडतात. त्यामुळे येथे नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे.
हिंजवडी आयटीनगरीतील रस्ता दुरुस्त करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांची सरपंच मच्छिंद्र हुलावळे यांच्यासह भेट घेतली. त्यांना रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. डिसेंबर अखेरीस हा रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवू, असे आश्वासन भोसले यांनी दिले आहे.
– विलास साखरे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष.
किमान हद्दीच कोडे तरी उलगडले
हा रस्ता नक्की कोणाच्या अखत्यारीत येतो यावरून ग्रामस्थ ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये देखील संभ्रम होता. परंतु महापालिकेला दिलेल्या या निवेदनामुळे त्याचे कोडे उलगडले. अन्यथा हा रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे, अशी समजूत होऊन आणखी काही वर्षे प्रश्न प्रलंबित राहिला असता.