कामशेत, दि.9 (वार्ताहर)- ग्रामीण मावळची मुख्य बाजारपेठ म्हणून कामशेत शहराची ओळख आहे. सुमारे सत्तर खेड्यातील नागरिक कामशेत बाजारपेठेला जोडली आहे. मात्र पार्कींगची नसलेली सोय व दुकानदारांच्या गर्दीमुळे बाजारपेठतील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. परिणामी या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल हळुहळू कमी होत असल्याचे वास्तव आहे.
मावळ तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेतमध्ये मावळातील सत्तर गावचे नागरिक बाजारहाटीसाठी येत असतात. तर या शहरातील भाताच्या गिरण्या, लग्न बस्त्याची प्रमुख दुकाने, सराफ बाजारपेठ प्रसिद्ध आहे. परंतु शहरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे कामशेत बाजारपेठ आर्थिक कोंडीत सापडली आहे. वाढते शहरीकरण, वाहनांचा वाढता वापर आणि शहरात नसलेली पार्किंगची सोय यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक महामार्गावर असलेल्या दुकानांकडे व वडगाव, तळेगाव, पिंपरी चिंचवडकडे खरेदीसाठी वळू लागला आहे. पार्किंगची सोय नसल्याने ग्राहक संख्येवर विपरीत परिणाम झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होणे गरजेचे आहे.मात्र त्यावर कार्यवाही होत नाही.
बाजारपेठेतील अनेक दुकानदारांची अतिक्रमणे रस्त्यावर आलेली आहे.रात्रीची वेळ साधून अनेक दुकानदार आपल्या दुकानांची बांधकामे वाढवत, दुकानांचे अतिक्रमण एकेरी विटांचे साह्याने करत आहेत. म्हणजे भविष्यात जरी अतिक्रमण काढण्याची वेळ आली तरी मोठे नुकसान होणार नाही. तर अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर येईपर्यंत वाढवलेल्या खोल्या उत्पन्न मिळवून देणार आहेत. एकंदरीत आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता दुकानदारांनी घेत अतिक्रमण केल्याचे दिसून येते.
जुनी बाजारपेठदेखील ओस
नव्या बाजारपेठतील दुकानदारांची अतिक्रमणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असताना जुन्या बाजारपेठेचे चित्रदेखील फारशी समाधानकारक नाही. पार्किंगसोबतच वडीवळेचा रेल्वे भुयारी मार्गामुळे जुनी बाजारपेठ ओस पडली आहे. हा रस्ता पूर्ववत सुरू झाल्यास, या बाजारपेठेला चालना मिळू शकणार आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने हादेखील प्रश्न प्रलंबित आहे.