कान्हे – जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत विश्रांतीकरिता थांबणाऱ्या अवजड, अपघातग्रस्त व नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा कायम धोकाआहे. विशेष करून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याची घटना घडल्या आहेत. रस्त्यालगतच उभी केलेली वाहने अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे शहर हे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. याठिकाणच्या औद्योगिक वसाहतीमधील उत्पादन प्रकल्पांमध्ये माल उतरविण्यासाठी अथवा नेण्यासाठी राज्यातून व परराज्यातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येत असतात. वाहनांमध्ये माल भरण्यास अथवा खाली करण्यासाठी वेळ असल्यास ही वाहने महामार्गालगत उभी केली जातात. याशिवाय महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल, ढाबा येथे जेवणाकरिता चालक थांबतात.
अशा थांबलेल्या वाहनांची संख्या अधिक असते. या वाहनांमुळे महामार्गावरून धावणाऱ्या इतर वाहनांसाठी रस्ता हा अरुंद होतो व चालकास रस्त्याचा अंदाज येत नाही विशेषत: उभ्या वाहनामुळे दुचाकीस्वार यासाठी मोठी अडचण निर्माण होते व अपघातही होतात याकडे रस्ते महामंडळ पोलीस प्रशासन लक्ष द्यावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थ करत आहेत.
महामार्गावर थांबलेल्या वाहनावर दुचाकी- चारचाकी वाहने आतापर्यंत धडकून अपघातहोऊन अनेक जणांनी प्राण गमावले आहेत. या अवजड वाहनांमुळे साईड पट्ट्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे भरधाव वेगातील वाहनचालकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे त्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे . या कडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी तेथील प्रवास करणारे नागरिक करत आहे
जुन्या पुणे मुंबई महामार्गलगत बेजबाबदारपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनामुळे रात्रीच्या वेळी नेहमी लहान मोठे अपघात होतात. अनेकांनी यामध्ये प्राण गमावले आहेत. प्रशासनाने आशा वाहनावर कारवाई करावी.
– सुनील चोपडे, नागरिक