नगर -लम्पी स्किन या घातक आजाराचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. आता जिल्ह्यातील 122 गावांमध्ये हा आजार पोहोचला असून 656 जनावरे बाधित झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांवर तातडीने उपचार केल्याने यातील 316 जनावरे बरी झाली आहेत. दरम्यान, आजाराचा उद्रेक झालेल्या गावांपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असणारी 620 गावांवर विभागाने लक्ष केंद्रीत केले असून या गावातील 7 लाख 39 हजार जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.
लम्पी आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बाधित जनावरांना वेगळे करणे तसेच पशुधनाचे लसीकरण करणे यांसारख्या उपाययोजना सुरू आहेत. बाधित जनावरे आढळल्यास त्या गावापासून पाच किलोमीटर अंतरात येणाऱ्या अन्य गावांतील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 61 हजार 976 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
..तर जिल्ह्यातही क्वारंटाईन सेंटर
दरम्यान, राज्यात ज्या ठिकाणी लम्पी आजाराचा जास्त प्रादुर्भाव आहे त्याठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जिल्ह्यात सध्या आजारी जनावरे आहे त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, यासंबंधी शासन आदेश आल्यास क्वारंटईन सेंटर सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.