लक्ष्मीकांत देशमुख : गरजांपेक्षा जास्त संपत्ती गोळा करण्याची स्पर्धा सुरू
पुणे – ‘गांधी हा भारताचा खरा प्रधान विचार आहे. अनेक महात्मांनी अनेक विचार दिले आहेत. खऱ्या अर्थाने भारतीयांना मानवणारा, पचणारा आणि त्या मार्गाने जाणे प्रत्येकाला शक्य आहे, असा विचार महात्मा गांधीजींनी दिला आहे. गांधीजींनी अहिंसा, सत्याग्रह, अपरिग्रह या तीन तत्वांचा अवलंब केला होता. सध्या सत्य बोलल्यानंतर त्याचा आवाज दाबण्याची प्रक्रिया चालू आहे. आशाने आपला आवाज हा कमी होणार आहे. सत्य बोलण्याचे काही परिणाम असले तरी सत्य बोलायलाच हवे. आपल्या गरजांपेक्षा जास्त संपत्ती गोळा करण्याची स्पर्धा चालु आहे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
“गांधी-150′ या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी वि.म. गिताली, माजी आमदार उल्हास पवार, सर्वोदयी विचारक जयवंत मठकर, विधान परिषदेचे कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद रणपीसे, बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावतीने ठाकरे कलादालनात आयोजित केले आहे.
उल्हास पवार म्हणाले, “ज्यांनी अणू बॉम्बचा शोध लावला त्या आईनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञालाही गांधीजींबद्दल प्रचंड आदर होता. असा माणूस पृथ्वीतलावर होईल किंवा नाही, असे भाष्य त्यांनी केले होते. गांधीजींच्या विचारांची गरज आज हिंसात्मक जगामध्ये सगळ्यांना प्रचंड जाणवत आहे’.
प्रास्ताविक अभय छाजेड यांनी केले आणि आभार डॉ. सतिश देसाई यांनी मांडले. यावेळी लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, नीता रजपूत, संगीता तिवारी, उमेश कंधारे, विकास लांडगे, सुहास रानवडे, नुरूद्दीन सोमजी, संतोष पाटोळे, आबा जगताप, नरेंद्र व्यवहारे, हेमंत राजभोज, यासिन शेख, रवींद्र ननावरे, इरफान पटेल, कृष्णा सोनकांबळे, सिमा महाडीक, विजय उत्तुरे, रजीया बल्लारी, सचिन आडेकर, स्वप्निल नाईक, महेश गायकवाड आदी उपस्थित होते.