रामराजे यांचे गौरवोद्गार
फलटण – फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने वेगवेगळ्या पध्दतीने व नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून काळानुरुप जे बदल केले आहेत ते कौतुकास्पद आहेत. येथील योजनांचे अनुकरन अन्य बाजार समित्याही करु लागल्या आहेत. त्यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा आदर्शवत ठरणारा आहे. शेतकऱ्यांच्या सेवेचे व्रत जोपासणाऱ्या या बाजारसमितीस आपले कायम पाठबळ राहिल असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार दीपकराव चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका आदींची उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, येथील काही योजना यशस्वी ठरण्याच्या मार्गावर असून तसे झाले तर भविष्यात या योजना एक धोरण म्हणून राज्य पातळीवरही अवलंबिल्या जातील व या सर्वास चेअरमन रघुनाथराजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कष्ट कारणीभूत असतील असे स्पष्ट करुन ते म्हणाले शेती दिवसेंदिवस कठिण होत आहे.
बदललेले निसर्गचक्र, बदलते वातावरण अशा अनंत अडचणी समोर आहेत. यातूनही पिक घेतलं तर त्यांना चांगला भाव न मिळाल्यास सर्व कष्ट वाया जातात. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांना एकत्रित आणून शेतकऱ्यांना योग्य भाव व त्वरीत पैसे मिळावेत व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बाजार समित्यांनी कार्यरत रहायला हवे असे सांगून फलटण बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सेवेचे व्रत असेच जोपासावे. त्यासाठी जी काही ताकद लागेल ती मी देईन अशी ग्वाहीही रामराजे यांनी यावेळी दिली.
फलटण बाजार समितीने हाती घेतलेले कृषिवल पेट्रोलियम व शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधांयुक्त असणारा दवाखाना हे उपक्रम अंतिम टप्प्यामध्ये आहेत. दिवाळीपूर्वी ते अंमलात आणून शेतकरी बांधवांना दिवाळीची गोड भेट देणार असल्याचे प्रतिपादन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
या व्यतिरिक्त रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी व्यथा निवारण कक्ष, महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर कार्डियाक सर्पदंश रूग्णवाहिका, आरोग्य समिती अशा अन्य योजनांद्वारे शेतकरी हिताचे निर्णय राबविण्यावर आमचा भर राहिल असेही रघुनाथराजे यांनी सांगितले. कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सचिव शंकरराव सोनवलकर यांनी विषयांचे वाचन केले. कार्यक्रमास सभासद शेतकरी, व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते.