उत्पादन घटणार, शेतकरी चिंतेत : कडधान्ये काढणी खोळंबली
कापूरहोळ- मागील दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे भोर तालुक्यातील भाताचे आगार धोक्यात आले आहे. सोमवारी (दि. 21) रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वच ओढे, नाले, नद्या तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. यामुळे भात शेतीचे मोठे नुकसान होऊन भात खाचरे व ताली वाहून गेल्या आहेत.
भोर तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कासुरडी, तेलवडी, आळंदे, कापूरहोळसह भोरच्या इतर भागात सोयाबीन, भुईमूग, कडधान्य, हाळवे, भात पीक काढणी तसेच ज्वारी पेरणी करता आली नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या चालू हंगामातील पिकांचे पूर्णपणे नियोजन ढासळले असून, हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सततचा पडणाऱ्या धो-धो पावसामुळे शेती, ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे भात शेतीच्या बांधावरून पाणी वाहून गेले आहे. बांध, ताली फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकाबरोबरच शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
- भाताचे आगार धोक्यात
तालुक्यातील भाताचे आगार धोक्यात आले असून, उत्पादनात निम्याहून अधिक घट होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस जर बंद झाला नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार हे मात्र नक्की.