मुंबई -अनेक राज्यांनी आपले मजूर आपल्या राज्यात परत घेण्यास अनेक अटी घालून आडकाठी केली आहे असा दावा महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या संबंधात आज जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अनेक राज्यांनी अशी आडमुठी भूमिका घेतल्यानेच स्थानिक मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोचवण्यासाठी राज्य सरकारने हरप्रकारे प्रयत्न केले आहेत. पण अनेक राज्ये त्यांच्याच नागरिकांना परत घेण्यास तयार नाहीत. या स्थितीत आता केंद्र सरकारनेच हस्तक्षेप करून या राज्यांना तसे
करण्यास राजी करावे असे त्यांनी म्हटले आहे. थोरात यांनी म्हटले आहे की आजही महाराष्ट्रात पररराज्यातील जवळपास दहा लाख मजूर आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जायचे आहे.
आत्तापर्यंत 32 रेल्वेगाड्या त्यांच्यासाठी सोडण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यातीलही अनेक मजूर महाराष्ट्रात आहेत. पण त्या राज्यांनी मजुरांना परत घेण्यास नकार दिला आहे. या मजुरांची करोना चाचणी करून द्या अशी मागणी ओडिशाने केली आहे. तामिळनाडुनेही अशाच स्वरूपाच्या अटी घातल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
या पूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्तरप्रदेश, गुजरात अशा राज्यांनीही अशाच स्वरूपाच्या अटी घालून या मजुरांच्या परतीचा मार्ग बिकट बनवला आहे असे थोरात यांनी नमूद केले होते. काही दिवसांपूर्वीपर्यंत बिहार या संबंधात चांगले सहकार्य करीत होते पण आता त्यांनीही या मजुरांना परत घेण्यास नकार दिला आहे. या मजुरांना परत पोचवण्याचा खर्च कॉंग्रेसने उचलण्याची तयारी दर्शवूनही ही राज्ये त्यासाठी सहकार्य करीत नाहीत असेही थोरात यांनी म्हटले आहे.