पुणे -राज्य शासनाने राज्य बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता बारावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करण्यासाठी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रामुख्याने दहावी, अकरावी व बारावी या तीन वर्षांच्या एकत्रित अंतर्गत मूल्यमापनावरच बारावीचा अंतिम निकाल तयार होण्याची अधिक शक्यता आहे.
सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी “सीईटी’ घ्यावीच लागणार आहे, असा शिक्षण तज्ज्ञांचा सूर आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सीबीएसई, सीआयएससीई, आणि महाराष्ट्र या बोर्डांनी दहावी पाठोपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत.
या बोर्डांनी दहावीसाठी मूल्यमापन आराखडा तयार केला आहे. मात्र, बारावीच्या निकालाबाबत अद्याप असा आराखडा तयार करुन, तो जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक आपआपल्या परिने निकषांबाबत तर्कवितर्क लावत आहेत.
राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाचा आराखडा विद्या प्राधिकरणातील तज्ज्ञ अधिकारी तयार करणार आहेत. यासाठी अधिकाऱ्यांनी निकालासाठी कोणते निकष लावायचे याची चाचपणी सुरू केलेली आहे. “सीबीएसई’कडून काय आराखडा जाहीर होतो, यावरच महाराष्ट्र बोर्डाचा आराखडा तयार होण्याची अधिक शक्यता आहे. यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो.
बारावी निकालाच्या निकषांचे पर्याय
-दहावीसाठी 30, अकरावी-30, बारावीसाठी 40 टक्के याप्रमाणे 100 टक्के गुणांचे एकत्रित मूल्यमापन.
-अकरावी व बारावीचे 50-50 टक्के गुणांप्रमाणे मूल्यमापन.
-केवळ बारावीच्या वर्षातील अंतर्गत परीक्षा व इतर ऍक्टिव्हिटीवर 100 टक्के गुणांचे मूल्यमापन.
परीक्षाच रद्द झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी अभ्यासपूर्ण निकष तयार करावे लागणार आहेत. केवळ अकरावी, बारावीच्या मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल लावून चालणार नाही, तर आगामी प्रवेशासाठी क्षेत्रनिहाय “सीईटी’ घेण्याची गरज आहे.
– प्रा. संतोष फाजगे, सचिव, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ
इयत्ता दहावी, अकरावी, बारावी या वर्षांचे एकत्रित मूल्यमापन करुन बारावीच्या निकालाचे मूल्यमापन करावे लागेल. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत लेखी परीक्षेच्या गुणांबरोबरच विद्यार्थ्यांच्या इतर बाबीतील विविध स्पर्धा, कार्य यांचाही प्राधान्याने विचार करायला हवा आहे. पुढील प्रवेशासाठी ऑनलाइन पण ऐच्छिक “सीईटी’ घेतल्यास विद्यार्थ्यांचा असंतोष कमी होऊ शकणार आहे.
– डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक
अकरावी, बारावीच्या मूल्यमापनावर बारावीचा अंतिम निकाल तयार करावा लागणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी या पदवी अभ्यासाठी “सीईटी’ घेण्यात येते. इतर सर्वच पदवी अभ्यासक्रमांसाठी “सीईटी’ची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने अभ्यासाची तयारीही करावी.
– हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा