पुणे – राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये करोना नियंत्रणात आला आहे त्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमधील निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल मात्र ज्या जिल्ह्यात करोनाचे बाधित काही प्रमाणात वाढ दर्शवित आहे तेथील निर्बंधामध्ये वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या संकेतामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी शेतीच्या कोणत्याही कामावर लॉकडाऊनचे निर्बंध असणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
12वीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सांगताना त्यांनी केंद्र सरकारने याबाबत देशव्यापी धोरण आखण्याची गरज व्यक्त केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी दूरदृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी त्यावर यश मिळाविण्यात आलेले नाही असे स्पष्ट केले.
ते म्हणाले गेल्या वर्षी ही लाट शिखरावर असताना जेवढी सरासरी रूग्णसंख्या होती तेवढीच रूग्णसंख्या आज दिसत आहे. गेल्यावर्षी 17 ते 19 सप्टेंबर या काळात 24 हजार 886 एवढे सरासरी नवे बाधित सापडत होते. 26 मे रोजी 24 हजार 752 नवे बाधित सापडले.
याचाच अर्थ आपण करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी त्यावर मात करण्यात अद्याप यशस्वी ठरलो नाही. त्यामुळे आगामी काही काळ निर्बंध कायम ठेवावे लागतील अन्यथा चावीवाल्याप्रमाणे कुलूप बंद कुलूप उघडणे एवढेच काम आपल्याला करावे लागेल.