नगर, (प्रतिनिधी) – प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतात. या समस्या कोणत्या मार्गाने सोडवून उर्वरित आयुष्य सुखा-समाधाने जगता येईल. या मार्गाची आपण निवड केली पाहिजे. आपसातील वाद हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून मिटविणे हा चांगले आयुष्य जगण्याचा कायदेशीर मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहर आणि मध्यवर्ती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे रविवारी (दि.३) आयोजन करण्यात आले होते. नगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा बोलत होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नाईकवाडे, वकील संघटनांचे पदाधिकारी, न्यायिक अधिकारी आदी उपस्थित होते.
न्या. यार्लगड्डा म्हणाले की, दैनंदिन जीवनासह कौटुंबिक जीवनातील वाद-विवादाचे प्रमाण वाढत आहे. आयुष्यातील वाद-समस्या सोडविण्याचा प्रयत्न नातेवाईक, मित्र परिवारासह आपले हितचिंतक ही करत असतात. प्रत्येकाचे विचार, दृष्टीकोन आणि अनुभव वेगळा असतो. अनेकदा एकमत होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा अंतिम निर्णय होत नाही. हे मार्ग संपल्यावर न्यायालयात येतात. न्यायालयात पुरावे सादर करणे, युक्तीवाद या प्रक्रियेनंतर निकाल दिला जातो. न्यायालयाचा निकाल एखाद्या पक्षकाराला मान्य नसल्यास पुन्हा अपिल केले जाते.
काही प्रकरणांमध्ये एका पिढीतील वाद दुसऱ्या पिढीत अनेक वर्ष न्यायालयात गेले आहेत. न्यायालय देईल तो निर्णय मान्य राहिल, अशी भूमिका झालेली असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील वाद- समस्या कोणत्या मार्गाने सोडविणे योग्य आहे, हे ठरविले पाहिजे. आयुष्य हे बहुमूल्य आहे. ज्या पक्षकाराला आपल्यावर अन्याय झाला, असे वाटते. त्या पक्षकाराने ते म्हणणे मांडावे. दोघांचेही म्हणणे ऐकूण सामंजस्याच्या निर्णय लोकन्यायालयात घेतला जातो. लोकन्यायालयात आपसातील वाद मिटवून उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगता येईल.
न्या. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, परिस्थितीमुळे हतबल झाल्याने वाद-दुरावा वाढलेला असतो. गणितात शून्याला एकटे असल्यावर किंमत नसते. परंतु, तो ज्या अंकाबरोबर जोडला जातो. त्या अंकाची किंमत कित्येक पटीने वाढते. गणितातील या सूत्राप्रमाणेच लोकन्यायालयाच्या पॅनलवरील न्यायिक अधिकारी, पॅनलचे सदस्य, वकील हे दोन पक्षकारांमधील वाद सांमजस्याने मिटवून एकत्र आणून तुमची किंमत वाढविण्याचे काम करत आहेत. ॲड. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. फारूख शेख यांनी आभार मानले.