कराड – गेल्या दोन वर्षात स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत झालेल्या विविध विकास कामात घोटाळा झाला आहे. तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने 1 कोटी 20 लाख 22 हजार रूपयांची बील काढली आहेत. तर एक जेसीबी आठ महिने सलग 23 तास सुरू होता आणि त्याचे बील 23 लाख रूपये काढण्यात आल्याचा गौप्यस्पोट नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केला. स्वच्छ सर्वेक्षणातील काळाबाजार झाल्याचे त्यामुळे चव्हाट्यावर आले आहे. तर स्वाक्षरीच्या मुद्दावर नगराध्यक्षा व जनशक्ती आघाडी आमने-सामाने आली असून कराड पालिकेत सध्या “ठराव वॉर’ सुरू आहे.
कराड नगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिली आहे. मग स्वच्छ सर्वेक्षण असो किंवा अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील वाद. यामध्ये कराडकरांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. गेल्या तीन वर्षात मुख्याधिकारी डांगे व नगराध्यक्षा शिंदे यांचा वॉर कराडकरांनी अनुभवला. एकमेकांची उणीधुणी काढण्यासह चिखल फेकीसारखे प्रकारही पाहिले आहेत.
त्यानंतर भाजपा आणि जनशक्ती आघाडी तर कधी जशक्तीअंतर्गत वादविवाद आणि टीकाटिप्पणी हे विषय कराडकरांसाठी नवीन राहिलेले नाहीत.
हल्ली कराडकर पालिकेतील चिखल फेकीला फारसे महत्व देत नाहीत. मुख्याधिकारी डांगे बदली नाट्यही चांगलेच रंगले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावत जंगी निरोप समारंभही पार पडला.
सध्या कराड पालिकेत “ठराव वॉर’ सुरू आहे. दि. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेले जवळपास दोनशे विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतके विषय कोणत्याही चर्चेविना मंजूर झाले. मात्र, अन्य विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. मंजूर विषय नगराध्यक्षा शिंदे यांच्याकडे स्वाक्षरीसाठी गेले.
परंतू, अंतर्गत वादात स्वाक्षरी होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी रमांकात डाके यांनी अध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना पत्र देऊन मंजूर ठरावांवर सह्या होणार नसतील तर 2021 चे स्वच्छता सर्वेक्षणातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. याच पत्रावरून पालिकेत नव्याने “ठराव वॉर’ सुरू झाले.
जनशक्ती आघाडीने पत्रकार परिषद घेत नराध्यक्षा मंजूर ठरावावर सह्या करणार नसतील तर आम्ही राजिनामे देऊ, असा इशारा दिला. 2021 च्या सर्वेक्षणात कराड पालिका पिछाडीवर पडली तर आम्ही जबाबदार नाही. स्वाक्षरी न करणाऱ्या नगराध्यक्षाच यासाठी जबाबदार असतील असेही स्पष्ट केले. त्याच दरम्यान मुख्याधिकारी डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंजूर ठरावापैकी फक्त स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत असणाऱ्या ठरावांवर अध्यक्षांच्या सह्या झाल्या असून सर्वेक्षणातील अडसर दूर झाल्याची माहिती माध्यमांना दिली.
मात्र, नगराध्यक्षांवर जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी आरोप-प्रत्यारोप केले याला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून होते. त्यांनीही पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन वर्षातील स्वच्छ सर्वेक्षणातील घोटाळाच माध्यमांसमोर मांडला. शहराच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वेक्षणाअंतर्गत असलेल्या ठरावांवर सह्या केल्याचेही त्यांनी सांगितले. गत दोन वर्षात सर्वेक्षणासाठी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी एक कोटी 20 लाख 22 हजार या रक्कमेची तीन बीले स्वतःच्या सहीने दिली आहेत. तर उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी ठरावातील फेरफारासंबंधी आरोप केले.
शिवाय स्वच्छ सर्वेक्षणात 8 महिने 23 तास जेसीबी सुरू होता त्याचे बील 23 लाख रूपये आणि अशा ठरावांवर अध्यक्षांनी स्वाक्षरी करायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय स्वच्छ सर्वेक्षणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण घडामोडीत कराड पालिकेतील स्वच्छ सर्वेक्षणातील यशाबरोबर स्वच्छ काळा बाजारही चव्हाट्यावर आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
ठरावात दडलयं काय?
कराड नगरपालिकेने देशपातळीवर मोठी कामगिरी केली आहे. त्यासाठी लागणारी सर्व कामे जेवढ्या गतीने करता येतील ती केली आहेत. मात्र, ती करत असताना त्यात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. ही कामे करण्यासाठी पालिकेतील कार्यरत असलेल्या विविध आघाड्यांचे ठेकेदार पुढे आले. तर इच्छुकांना कामे देण्यात आली नसल्याचीही चर्चा आहे. वास्तविक स्वच्छ सर्वेक्षणांअर्तगत होणाऱ्या कामांचे समान पातळीवर वाटप न झाल्याने कराड पालिकेत पहिल्यांदा “टेंडर वॉर’ आणि आता “ठराव वॉर’ सुरू झाल्याची चर्चा आहे.