खालापूर – पुरावे असूनही आरक्षण दिले जात नसेल तर पर्याय शोधायच कुठून? मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे. समित्या नेमल्या तरीही त्यांच्या हाताला पुरावे लागत नव्हते. मराठा संपला पाहिजे असे षडयंत्र रचण्यात आले. जितकी प्रॉपर्टी महत्वाची तितकाच आरक्षण पण महत्वाचे आहे. आंदोलन सुरू केल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात लाखात नोंदी सापडायला लागल्या आहेत, अशी माहिती देत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी (दि. 20) हजारोंच्या उपस्थितीत खोपोलीत सभा पार पडली. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या लेकरांच्या न्यायासाठी आहे. मराठा समाजासाठी आण्णा साहेब पाटील, विनायक मेटे, अण्णासाहेब जवळे पाटील, देविदास पाटील यांनी बलिदान दिले आहे. आपल्या आधी 42 आणि आत्ता 50 तरुण मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. मात्र यापुढे तरुणांनी आत्महत्या करू नये. मला तुमची गरज आहे. आता जे पुरावे सापडत आहेत, हेच आधी सापडले असते तर चित्र वेगळे असते. आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा यांनी एकत्र आले पाहिजे. मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही.
आरक्षणसाठी शांततेत आंदोलन करू. यामध्ये मतभेद आणू नका. जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिल नाही. तर 25 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक घेऊ. जे आंदोलन करायच ते जाहीरपणे तुम्हाला सांगितले जाईल. त्याचबरोबर 1 डिसेंबर पासून गावगावत साखळी उपोषणाची तयारी करा, असा सल्ला जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना दिला.
नाव न घेता छगन भुजबळांवर टीका
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. याबाबत भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले की, म्हातार माणूस काही बडबडत. त्याकडे लक्ष देऊ नका, अशी खोचक टीका केली.