भवानीनगर – आपल्या गावामध्ये बाहेरून येणारे नागरिक, नतेवाईकांची माहिती न लपवता स्थानिक आपत्ती निवारण समितीस कळवा, असे आवाहन वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.
मुंबई, ठाणे, पुणे या शहरामध्ये करोनाचा प्रसार वाढल्यामुळे या शहरातील नागरिक हे गावाकडे येत आहेत. हे नागरिक पोलीस पास न घेता तसेच घेतलेल्या पोलीस पासमध्ये चुकीची माहिती देऊन गावाकडे येत आहेत.
जर असे कोणी आपल्या गावात वास्तव्यास आल्यास त्यांची माहिती तात्काळ सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच स्थानिक आपत्ती निवारण समितीस कळवावी तसेच समितीने या नागरिकांना क्वारंटाइन करुन योग्य ती खबरदारी घ्यावी.
जे नागरिक अशी माहिती लपवून ठेवतील त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, साथीचा रोग अधिनियम 1897 या कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात येतील. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने परिपत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.