पुणे – लॉकडाऊनमुळे अनेक कामे ठप्प आहेत. मात्र, या परिस्थितीतही महापालिकेतर्फे पावसाळापूर्व कामे करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये गटारींची स्वच्छता, नालेसफाईबरोबरच नदीतील जलपर्णी काढण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे लवकरच नदी जलपर्णीमुक्त होऊन मोकळा श्वास घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लॉकडाऊनमुळे सध्या नदीतील पाण्यात मिसणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाणही कमी आहे. मात्र, अनेक ठिकाणी नदीमध्ये जलपर्णीचा विस्तार होत आहे. या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेकडून नदीतील जलपर्णी हटविण्याचे काम केले जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जाते. मात्र ती पूर्णपणे काढली जात नाही. तसेच ही काढलेली जलपर्णीची योग्य विल्हेवाट न लावता आहे, तशीच नदीच्या कडेला फेकण्यात येते. यामुळे पावसाळ्यात ती वाहून पुन्हा नदीच्या पाण्यात मिसळते आणि त्यामुळे जलपर्णीचा प्रादूर्भाव अधिक वाढत असल्याचे नदीविषयक काम करणाऱ्या पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत महापालिकेकडे सातत्याने तक्रार करूनही योग्य कारवाई होत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, हे काम दरवर्षीच केले जाते. त्यामुळे नदी स्वच्छता तात्पुरत्या स्वरुपातच होते. त्यामुळे यात फक्त ठेकेदारांचे चांगभले होते. पालिकेने नदी स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी होत असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नदीचे आरोग्य दुर्लक्षित होत आहे.