पुणे – परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेतील चुकांची तपासणी विषय तज्ज्ञांमार्फत पूर्ण करण्यात आली आहे. शुद्धलेखनासह काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
राज्यात दि.19 जानेवारी रोजी “टीईटी’ घेण्यात आली. प्रामुख्याने बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या पेपर क्रमांक-2 च्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुका मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. एकेका पानात 35-40 पर्यंत चुका असल्याचे उमेदवारांनी उघडकीस आणले. त्याची दखल घेत परीक्षा परिषदेने एका विषयासाठी दोन याप्रमाणे विषयतज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीमार्फत सर्व प्रश्नपत्रिकांची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. हा अहवाल निर्णयासाठी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप व आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रश्नपत्रिका असतात. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील, तरी उमेदवारांना प्रश्न वाचताना व अर्थ समजून घेण्यात काहीच अडचणी निर्माण झाल्या नसाव्यात. त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका झालेले प्रश्न सरसकट रद्द करता येणार नाहीत. काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याने व वाक्य अर्धवट असल्याने पाच प्रश्न रद्द करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
उमेदवार म्हणतात…
आता झालेली परीक्षा रद्द करावी. चुका झालेल्याच पेपरची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी काही उमेदवारांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भरपूर अभ्यास करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनी मात्र पुन्हा परीक्षा घेतल्यास आमच्यावर अन्याय होईल. त्यामुळे प्रश्नपत्रिका रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा विचारही करू नये, अशी मागणी परीक्षा परिषदेकडे केली आहे.