कराड – गेली 20 वर्षापासून सर्वसामान्य मतदाराला केंद्रस्थानी ठेवून कराड उत्तरच्या विकासासाठी अहोरात्र झटलो. मात्र या मतदार संघाचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांनी 20 वर्षात या मतदारसंघाचा कसलाही विकास केला नाही. ज्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या स्वप्नातील धनगरवाडी-हणबरवाडी पाणी योजना आमदारकीच्या काळात पूर्ण करता आली नाही, ते जनतेचे प्रश्न काय सोडविणार? यासाठी या निवडणूकीत अशा निष्क्रीय आमदाराना मतदार घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी दिला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती. अर्ज दाखल केल्यानंतर शाहूचौक ते स्टेडिअमपर्यंत भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. यानंतर शिवाजी स्टेडियम येथे आयोजीत जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी ना. नितीन बानुगडे-पाटील, आ. जयकुमार गोरे, राजाभाऊ देशपांडे, रामकृष्ण वेताळ, आरपीआयचे विरकायदे यांचेसह भाजप-सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कदम म्हणाले, मतदार संघाची आतापर्यत झालेली वाताहात यापुढे होणार नाही, यासाठी मी कटीबध्द राहणार आहे. अनेक वर्षापासून दुष्काळी भागातील 16 गावांचा पाणी प्रश्न, हणबरवाडी योजनेचे रखडलेले काम, इंदोलीचा पाणी प्रश्न याकडे विद्यमान आमदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. यामुळे कराड उत्तरची जनता पेटून उठली असून यावेळी त्यांना बदल हवा आहे.
मी निर्धार मेळाव्यात जाहिरपणे सांगितले होते की, महायुतीने तिकीट दिले तर लढेन, व नाही दिले तरी जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणेन. मला उमेदवारी मिळाली असून महायुतीच्या काफिलात सामिल होण्याचे घोरपडे यांचे नाव न घेता आवाहन केले. जयकुमार गोरे म्हणाले, शिल्लक राहिलेली कॉंग्रेस कराड दक्षिणेत आहे. उत्तरेत कोणीही गडबड करायची नाही. याठिकाणी माझ्या विचारांचाच आमदार असेल. ही निवडणूक उत्तरेचे भविष्य ठरविणारी होणार असून येथील बिनकामाचा आमदार बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न पणाला लावावेत.
ना. बानुगडे-पाटील म्हणाले, कराड उत्तरचं दायित्व माझ्याकडे असल्यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कदम यांच्या रुपाने नवा आमदार देण्याची गरज आहे. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. आपणाला त्यांना हात देवून उभारी देण्याची वेळ आली असून कराड उत्तरेत भगवा फडकणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.