माजी नगरसेवक धनंजय आल्हाट : खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे?
चिंबळी (वार्ताहर) – पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या स्वच्छतेसाठी किती व कसे कोट्यवधी रुपये खर्च झाले, याबाबत जनतेला माहिती होणे गरजेचे आहे. शिवाय येत्या काळात नदी स्वच्छतेबाबत पालिका काय पावले उचलणार, तेही समजणे नागरिकांचा अधिकार आहे. यामुळे पालिकेने नदी प्रदूषणाची श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी आयुक्त श्रवण हर्डीकर व महापौर उषा ढोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, मोरया गोसावी यांच्या पवित्र स्मृतींची ओळख असलेल्या स्मार्ट सिटी होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या या नद्या दोन महत्त्वाच्या जीवनदायिनी आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून विविध कार्यक्रम, उपक्रम, कामे राबवत पालिका नद्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र नदीची अवस्था तूसभरही बदलली नसल्याचे वास्तव आहे. नागरिकांना नदी स्वच्छतेसाठी काय प्रयत्न झाले, त्यासाठी किती पैसे खर्च केले, याची माहिती स्पष्टपणे उपलब्ध नाही. सर्वांच्या जिव्हाळ्याचा हा विषय दुर्लक्षित होत आहे.
दोन्ही नद्यांची सध्याची अवस्था बिकट आहे. जलपर्णी हा नदीचा कधीही न सुटणारा प्रश्न आहे.
दरवर्षी कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च होतात; पण जलपर्णी हटते ती फक्त पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरात. नदीत ड्रेनेज पाणी मिसळू नये म्हणून कोट्यवधी खर्चून पालिकेने ड्रेनेज लाईन टाकली आहे. मात्र, ती जागोजागी फुटली आहे. विषारी आणि मैलामिश्रित पाणी नदीत मिसळत आहे. नदी स्वच्छतेसाठी अनेक आंदोलन करण्यात येत आहेत. सामाजिक संस्थांकडून याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवरोवर चर्चा करण्यात आली. त्यानसार दोनही नद्या स्वच्छतेसंदर्भात कोट्यवधी रकमेचा निधी खर्च करण्यात आला; परंतु यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
आजतागायत नद्यांच्या पाण्याचे वॉटर ऑडिट केले गेले नाही. नदी सुधारसाठी विकास योजना आराखडा अद्याप तयार नाही. नद्यांची आजची प्रदूषणासंदर्भात स्थिती काय आहे, नदी स्वच्छतेकरिता किती रक्कम खर्च करण्यात आली, या संबंधित माहिती नागरिकांना समजणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे या संदर्भात त्वरीत श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.
– धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक