नवी दिल्ली – भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांच्या संदर्भातील अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेला अहवाल भारताने फेटाळला. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अशा प्रकारचे मतपेढीचे अर्थात व्होटबॅंकेचे राजकारण करणे चुकीचे असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, अमेरिकेच्या मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात जारी केलेल्या अहवालाची व त्यात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या टिप्पणीची दखल घेतली असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.
अमेरिकेने पक्षपाती विचार करू नये आणि भारताच्या संदर्भात योग्य मूल्यांकन करावे. भारत नेहमीच धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकार या मुद्द्यांना महत्व देत आला आहे. अमेरिकेच्या सोबत झालेल्या चर्चांमध्ये आम्ही नेहमीच वर्ण आणि जातीद्वेषातून प्रेरीत हल्ल्यांच्या संदर्भात, बंदुकीच्या आधारने केल्या हिंसचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.