नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आठ करोना विषाणूबाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. 14 दिवसानंतरचा त्यांना अहवाल आज निगेटिव्ह आल्याने नगरच्या वैद्यकीय पथकाने या रुग्णांना सोडण्याचा निर्णय घेतला. तथापि, त्या सर्वांना पुन्हा विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. वैद्यकीय यंत्रणेची ही माहिती नगरकरांसाठी आज दिलासा देणारी ठरली.
काल (ता.18) रात्री नगर जिल्ह्यात नेवासे व जामखेड येथे प्रत्येकी एका रुग्णाची वाढ झाली होती. त्यामुळे पाच दिवसानंतर पुन्हा एकदा चिंताजनक बातमीने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यात आज ही बातमी प्रसारीत झाल्याने नगरकरांना हायसे वाटले आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेले रुग्ण अलगीकरणसाठी संगमनेर आणि जामखेड येथे ठेवण्यात येणार आहेत. संगमनेर शहरातील 3, आश्वी बुद्रुक येथील 1 आणि जामखेडमधील 4, असे 8 करोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. करोना विषाणूबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे.
या आठ जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. या चौघांना आता सोडण्यात येणार आहे. करोनामुक्त झालेले या 8 पैकी
नगरचे आणखी दोन अहवाल पॉझिटिव्ह जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शुक्रवारी पाठविलेल्या अहवालापैकी दोन व्यक्तींचे अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. यात जामखेडमधील मयत व्यक्ती तर दुसरा नेवासा तालुक्यातील बाधीत व्यक्तीचा 14 दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश आहे. उर्वरित 32 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
त्या व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू
शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात बाधीत रुग्णापैकी एक व्यक्ती जामखेड येथील आहे. या व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. शनिवारी अहवाल आला आणि तो करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
करोनाबाधितांचा आकडा 29
जिल्ह्यात आधी करोना बाधीतांची संख्या 28 होती. जिल्ह्यात 12 मार्चला करोना बाधीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर 13 एप्रिलपर्यंत 28 रूग्ण आढळले. मात्र, प्रशासनाने, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेने लॉकडाऊन काळात चांगली भूमिका बजावल्याने 13 एप्रिलनंतर जिल्ह्यात एकही बाधीत आढळला नव्हता. दरम्यान शनिवारच्या अहवालात जामखेडमधील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 29 झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगरकरांना पुन्हा दिलासा
संगमनेरमधील चार आणि जामखेडमधील चार रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणसाठी दाखल केले जाणार आहे. नगरमध्ये करोनाबाधितांचा आकडा हा 29 आहे. नगर शहरात आणि जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून नव्याने करोनाबाधित रुग्ण आढळत नसल्याने ते दिलासादायक ठरत आहे. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात कसरत करत आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.