केडगाव- महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी केव्हा आणि कशी केली जाते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाशिवआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या; परंतु ती नेमकी किती आणि कशी मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रथमपासून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, याबाबत आग्रही होते. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्जमाफीच्या मागणीने आणखीच जोर धरला आणि प्रचारकाळात राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला जागून ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून शेतकरी बांधवाना दिलासा दिला आहे.
मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला होता. राज्यात सतत चार वर्षे अपुरे पर्जन्य त्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई आणि चालू वर्षी परतीच्या पावसाचा धुमाकूळ, यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. बॅंका आणि पतसंस्थाचे हप्ते थकले होते. खासगी सावकरांनी डोके वर काढल्याने शेतकरी आणखीच पेचात पडला होता. शेतीत असणाऱ्या मालाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली होती. कर्जमाफी हा त्यावरील कायमस्वरूपी उपाय नसला तरी खितपत पडलेल्या शेतकऱ्यां दिलासा देणारा नक्कीच आहे.