नवी दिल्ली – मुकेश अंबानी संचलित रिलायन्स इंडस्ट्रीज आगामी काळात हरित ऊर्जा प्रकल्पावर लक्ष केंद्रित करणार असून पाच वर्षात अशा प्रकल्पांमध्ये 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केली आहे.
पुढील 10 ते 15 वर्षात हे प्रकल्प गुजरात राज्यात उभे केले जाणार आहेत. यामध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांचा समावेश असेल. यासंदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीजने गुजरात सरकारबरोबर सहकार्य करार केला आहे. या गुंतवणुकीमुळे दहा लाख रोजगार निर्माण होतील असे सांगण्यात आले.
यासाठी कंपनीने गुजरात सरकारकडे कच्छ जिल्ह्यामध्ये साडेचार लाख एकर जागेची मागणी केली आहे. या ठिकाणी मुख्य प्रकल्पाबरोबर इतर छोटे मोठे उद्योग उभे राहू शकतील असे रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.