नवी दिल्ली – कोविडमुळे देशात आत्तापर्यंत नेमके किती लोक मरण पावले याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, प्रचलीत नियमानुसार या मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. राहुल गांधी यांनी गुजरातमधील एका कुटुंबाचा आक्रोश असणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
या कुटुंबांमधील कर्त्या व्यक्तींचे करोनामुळे निधन झाले आहे. त्या कुटुंबाला सरकारकडून कोणतीच मदत वेळेवर मिळालेली नाही. हा संदर्भ देत राहुल गांधी यांनी तथाकथित गुजरात मॉडेलवरही निशाणा साधला. चार लाख देना होगा हा हॅशटॅगही त्यांनी ट्विटरवर चालवला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ज्यांनी आपले जवळचे नातेवाईक कोविड काळात गमावले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करून सरकारने त्यांच्या दु:खाचा भार थोडा तरी हलका केला पाहिजे.