नवी दिल्ली – जनतेने नाकारलेले पक्ष मतपेढीच्या आणि फुटिरतावादी राजकारणाचा आश्रय घेत आहेत, अशा शब्दांमध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष थेट देशाच्या चैतन्यावरच हल्ला करत आहेत आणि देशातील कष्टकरी नागरिकांच्या कमाईचीच आकांक्षा धरत आहेत, असेही नड्डा यांनी म्हटले आहे.
देशभरात सध्या सुरू असलेल्या द्वेषमूलक भाषा आणि जातीय हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर 13 विरोधी पक्षांनी मिळून एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले होते. त्याला नड्डा यांनी देशवासियांना उद्देशून एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये विरोधकांवर त्यांनी टीका केली.
मतपेढीच्या राजकारणात, फुटिरतावादी राजकारणात देशातील विरोधी पक्ष अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सब का साथ, सब का विकास’ वर भर दिला आणि “सब का विश्वास, सब का प्रयास’ची जोड दिली. त्यामुळे भविष्यातील प्रवासासाठी देशवासियांना बळ मिळाले आहे. पण नाकारलेल्या पक्षांकडून विकासाच्या राजकारणाला विरोध केला जात आहे. हे विरोधक आता पुन्हा एकदा मतपेढी आणि फुटिरतावादाचे राजकारण करत आहेत, असेही नड्डा म्हणाले.
देशातील युवकांना संधी हवी आहे, अडथळे नको आहेत. सर्व जाती-धर्म आणि स्तरांमधील लोक गरिबीविरोधात एकवटले आहेत. विरोधकांनीही आता विकासाचे राजकारण करावे, अशी आपली सूचना असल्याचे नड्डा म्हणाले.
करौलीच्या दंगलीवरून मौन बाळगण्याचे काय कारण आहे, असा सवाल त्यांनी राजस्थानमधील कॉंग्रेसच्या नेत्यांना केला. पूर्वी काही राज्यांमध्ये कॉंग्रेसचे सरकार असताना झालेल्या जातीय दंगलींचाही त्यांनी उल्लेख केला.