सातारा -शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास दि. 25 फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यात 227 शाळांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत एक हजार 27 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आल्याची माहिती शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलामुलींसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होते; परंतु 2022-23 या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांनी नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्याने प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. या कायद्यान्वये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे लागत असल्याने शाळा नेहमीच पळवाटा शोधत असतात. शाळांनी नोंदणी न केल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली.
त्यामुळे आरटीईअंतर्गत 1 फेब्रुवारीऐवजी 16 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास 25 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 227 शाळांची नोंदणी असून, एक हजार 931 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार 27 विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणी झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्चपर्यंत आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू होती. मध्यंतरी काही महिने प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यंदा करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत करण्याची मागणी होत आहे.