जयपूर -आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनाचे दर खाली आले आहेत. त्याचा लाभ देशातील जनतेला मिळवून देण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरूवारी मोदी सरकारकडे केली.
गेहलोत यांनी वाढत्या इंधन दरांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचा दर प्रतिपिंप 120 डॉलर्स इतका होता. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 70 रूपये होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 50 डॉलर्सच्याही खाली गेला आहे. तरीही मोदी सरकार सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहे. सिलिंडरमागे स्वयंपाकाचा गॅस 50 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे जनतेच्या कौटूंबिक बजेटवर ताण येत आहे.
सिलिंडरवरील अनुदानही थांबवण्यात आले आहे. करोना संकटकाळात जनतेला मदत करण्याऐवजी मोदी सरकार महागाईचा भार लादत आहे. एखाद्या राज्यात निवडणुका असतात तेव्हा इंधन दर स्थिर राहतात. मात्र, निवडणुका झाल्या की लगेच इंधन दरवाढ होते, अशी शाब्दिक टोलेबाजी गेहलोत यांनी ट्विटरवरून केली.