जैव-वैद्यकीय कचरा कमी करण्यासाठी “वज्रकवच’ प्रणाली विकसित
पुणे – जैव-वैद्यकीय कचरा कमी करण्यासाठी मुंबईस्थित एका कंपनीने पर्यावरण पूरक अशी “वज्रकवच’ प्रणाली विकसित केली आहे. यामुळे मास्क, कोट, ग्लोव्हज, पीपीई किट, गाऊन असे वैद्यकीय क्षेत्रात रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तुंवरील 99.999 टक्के विषाणू नष्ट होऊन त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण होईल. तसेच जैव-वैद्यकीय कचरा कमी करण्यातही मदत होईल, असा दावा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या उपकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबईतील “इंद्रा वॉटर’या स्टार्ट-अप कंपनीने हे “वज्रकवच’ विकसित केले आहे. फ्रीजप्रमाणे याची बनावट असून, ते वीजेवर चालणारे आहे. त्यात विषाणू एक लाख पटीने नष्ट होतात, असा दावाही कंपनीने केला आहे. “आयआयटी मुंबई’च्या जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभागात या प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर या विभागाने तिला मान्यता दिल्याचे कंपनीचे सहसंचालक अभिजित व्ही. व्ही. आर. यांनी सांगितले.
“वज्रकवच’च्या चाचण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया अत्यंत दीर्घकाळ सुरू होती. पीपीई किटवर विषाणू आणि जीवाणूंचे अनेक नमुने पसरवले आणि त्यानंतर “वज्रकवच’ प्रणालीत हा पीपीई सूट ठेवला. निर्जंतुकीकरण प्रक्रियेनंतर, पीपीई बाहेर काढला, त्यानंतर त्यावरील विषाणूंचे नमुने पुन्हा तपासले गेले ज्याद्वारे वाढीचे प्रमाण आणि लॉगमधील घट दिसून आली.
मुंबई येथील रुग्णालयांमध्ये वापर…
करोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या “कवच’ या उपक्रमांतर्गत “इंद्रा वॉटर’सह 51 स्टार्ट-अप कंपन्यांना निधी आणि इतर सहकार्य केले जाते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील “राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळा’तर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. ही प्रणाली मुंबईच्या कामा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि आयआयटी मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात बसवली आहे.
या ठिकाणी ती केवळ एन-95 मास्क आणि पीपीई किट्स निर्जंतूक करण्यासाठीच नाही, तर प्रयोगशाळेत वापरले जाणारे कोट्स, मास्क, ऍप्रन्स, फेस शिल्ड, अतिदक्षता विभागातील इतर साधने, विविध वैद्यकीय साधने, उपकरणे आणि इतर वैद्यकीय कापडांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीही वापरली जात आहे.