नवी दिल्ली/मुंबई – खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “आत्मनिर्भर भारत अभियान’ नव्या उंचीवर नेले आहे. आयोगाने भारताचे उज्ज्वल चित्र जगासमोर मांडले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशभर खादी ग्रामोद्योगच्या उत्पादनांची उलाढाल 1.34 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच खादी ग्रामोद्योग आयोगाने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. खादी उत्पादनांच्या विक्रीच्या आकड्यांनी भारतातील सर्व उत्तम एफएमसीजी (वेगाने विकली जाणारी उत्पादने) कंपन्यांना व्यवसायात मागे टाकले आहे. खादी-ग्रामोद्योग आयोगाने वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात 1.34 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर 2013-14 मध्ये हीच उलाढाल अवघी 31,154 कोटी रुपये होती. 2013 ते 2023 या दरम्यानच्या दशकामध्ये स्वदेशी खादी उत्पादनांच्या विक्रीत 332 टक्के वाढ झाली आहे.
2021 मध्ये, खादी ग्रामोद्योग आयोगाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या आणि स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने 50 हजाराहून अधिक उत्पादने ऑफर करणारा एक अनोखा सरकारी ऑनलाइन मंच सुरू केला. केंद्र सरकारच्या व्होकल फॉर लोकल मोहिमेने खादीला देशांतर्गत आणि परदेशात लोकप्रियतेच्या नवीन उंचीवर नेले आहे.
अलिकडच्या वर्षांत, खादी ग्रामोद्योग आयोगाने कारागीर आणि बेरोजगार तरुणांसाठी शाश्वत रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाने 2022-23 मध्ये ग्रामीण भागात 9.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. तर 2013-14 मध्ये 5.6 लाख नोकऱ्या दिल्या आहेत.
उत्पादन आणि विक्रीत मोठी वाढ
खादीच्या कपड्यांनी विशेषतः उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वर्ष 2013-14 मध्ये खादीचे उत्पादन 811 कोटी रुपये होते. तर 2022-23 मध्ये हे उत्पादन 2,916 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. ही वाढ 260 टक्क्यांनीअधिक आहे. खादी कपड्यांची विक्री 2013-14 मध्ये 1,081.04 कोटी रुपये होती. वर्ष 2022-23 मध्ये ही विक्री 5,942 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ 450 टक्क्यांनी अधिक आहे. उत्पादन आणि विक्रीत झालेल्या या वाढीचा खादी क्षेत्राशी संबंधित कारागिरांना मोठा फायदा झाला आहे. 2013-14 पासून त्यांच्या मानधनात 150 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.