पेठ (प्रतिनिधी) – पेठ ता. आंबेगाव येथे एका 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तब्बल दिड महिना कोरोनामुक्त असलेल्या पेठ गावात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केल्याने पेठ गावातील तसेच परीसरातील सहा ही गावांतील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आज पेठ ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष मिटिंग घेऊन पुढील आदेश येईपर्यंत गावातील अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्या चे जाहीर केले.
पेठ गाव हे आंबेगाव तालुक्या चे प्रवेशद्वार असल्याने व सातगाव पठार भागातील 7 गावांची मुख्य बाजारपेठ असल्याने उद्या (दि. 23) पासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच अनिल सणस यांनी दिली.
येथे 29 मे रोजी 2 रूग्ण आणि 2 जुलै रोजी 4 रूग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. मात्र या सहाही रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यामुळे पेठ गाव कोरोनामुक्त झाले होते. त्यांनतर तब्बल दिड महिन्यांनंतर गावात पुन्हा एकदा कोरोनाचा 56 वर्षीय रूग्ण सापडल्याने पेठ गावात व सातगाव पठार वासीयांच्या कोरोनामुक्तीच्या स्वप्नाला ब्रेक लागला आहे.
गावातील ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी चांगले प्रयत्न करत तब्बल दिड महिना नागरीकांचे कोरोनामुक्तीसाठी चांगले प्रबोधन करत गावाला कोरोनापासून मुक्त ठेवले होते.
मात्र आज एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता पुन्हा एकदा चांगलीच खबरदारी पाळणे गरजेचे झाले आहे. सदर पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांने स्वतःची कोरोना चाचणी खाजगी दवाखन्यामध्ये करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर रूग्णांस मंचर येथील भिमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
त्या धरतीवर ग्रामपंचायत मध्ये आज सकाळी 10 वाजता तहसीदार रमा जोशी यांचे आदेशानुसार मीटिंग झाली. बँका, पतसंस्था, दुकाने, हॉटेल व इतर व्यवसाय बंद देवण्यात येणार असून दवाखाने व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दूध उत्पादन शेतकरी यांचे नुकसान होऊ नये यासाठी सकाळी 7 च्या आत डेअरीत दूध आणून देताना सोशल डिस्टन्स ठेऊन घ्यावे. कृषी सेवा केंद्र मात्र सुरू राहतील.
गावात बिगर मास्क फिरताना आढळल्यास 500 रु दंड व कायदेशीर कारवाई केली जाईल. गावातील मुख्य रस्ता वगळता सर्व अंतर्गत रस्ते सील करण्यात येणार असल्याचे सरपंच सुरेखा पडवळ, उपसरपंच अनिल सणस, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, अशोक राक्षे, विनायक धुमाळ, बाळासाहेब रागमहाले, गाव कामगार तलाठी हेमंत भागवत, ग्रामसेवक एम जे चौगुले , सलीम तांबोळी शाहरुख पटेल यांनी सांगितले.