संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीवर भारताची पुन्हा निवड झाली आहे. ही निवड सन 2022 ते 2024 या वर्षांसाठी असेल. गुरुवारी ही निवड झाली. संवाद, सन्मान आणि सहयोगाद्वारे मानवी हक्कांचे संरक्षण आणि त्या तत्त्वाला आम्ही प्रोत्साहन देत राहू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवड झाल्यानंतर म्हटले आहे.
या समितीवर भारताची ही सहाव्यांदा निवड होत आहे. प्रचंड बहुमताने भारताला निवडून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी संयुक्तराष्ट्र सदस्य देशांचे जाहीर आभारही मानले आहेत. गुप्त मतदान पद्धतीने ही निवड करण्यात आली.
त्यात अर्जेंटिना, बेनीन, कॅमेरून, इरीट्रिआ, फिनलंड, गाम्बिया, होंडुरास, कझाकस्तान, लिथुनिया, लक्झेंमबर्ग, मलेशिया, मॉन्टेनेग्रो, पेराग्वे, कतार, सोमालिया, यूएई आणि अमेरिका या देशांची या समितीवर निवड झाली आहे.