नवी दिल्ली – सरकारी कार्यक्रमा अंतर्गत विविध ठिकाणच्या पाण्याचे जे नमूने तपासण्यात आले त्यातील 1 लाख 11 हजार नमूने दूषित आढळले आहेत अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
सरकारच्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी आणि सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत ही नमूने तपासणी करण्यात आली. दूषित पाण्यामध्ये रासायनिक द्रव्ये आणि खनिजांचे प्रमाण खूप आढळून आले. त्यात प्रामुख्याने आर्सेनिक, फ्लोराईड्स, आर्यन, आणि युरेनियमचे प्रमाण आढळून आले आहे.
त्याखेरीज या पाण्यामध्ये किटकनाशके, जीवजंतू आदि प्रकारही आढळून आल्याचे जलशक्ती मंत्रालयाने म्हटले आहे. काहीं नमुन्यांमध्ये सांडपाणी व मैलामिश्रीत पाण्याचेहीं काहीं अंश सापडले आहेत. पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून ते पाणी नळांद्वारे लोकांच्या घरात पोहचवले जाणे अपेक्षित असते परंतु काहीं ठिकाणी प्रक्रिया न केलेले पाणीही लोकांच्या घरात नळ्याद्वारे पोहचवले गेल्याचे या पहाणीत आढळून आले आहे.
सरकारी प्रयोगशाळांमध्ये एकूण 13 लाख 17 हजार 28 पाण्याचे नमूने तपासले गेले, त्यापैकी 1 लाख 11 हजार 474 नमूने दूषित आढळले आहेत.