चेन्नई – तामीळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी त्या राज्याचे मंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांना बडतर्फ करण्याचा निर्णय मागे घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्ल्यामुळे रवी यांनी माघार घेतल्याचे समजते.
बालाजी यांना काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. नोकऱ्यांच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आणि मनी लॉण्डरिंग केल्याच्या आरोपावरून ती कारवाई करण्यात आली. त्याआधारे रवी यांनी गुरूवारी बालाजी यांना मंत्रिपदावरून तडकाफडकी हटवले.
त्याचे तीव्र पडसाद उमटले. मंत्र्याला बडतर्फ करण्याचा अधिकार राज्यपालांना नसल्याचे म्हणत सत्तारूढ द्रमुकने न्यायालयीन लढ्याचे सूतोवाच केले. कायदेतज्ञांनीही रवी यांच्या कृतीविषयी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर ऍटर्नी जनरल यांचा सल्ला घेण्यासाठी बडतर्फीला स्थगिती देत असल्याचे काही तासांतच रवी यांनी नमूद केले.