- मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली आवक
- गेल्या वर्षीपेक्षा 15 दिवस आधीच दाखल
पुणे – गोड, रसदार अशा रत्नागिरी हापूसची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पंधरा दिवस आधीच ही आवक झाली आहे. मे. नामदेव रामंचद्र भोसले अँड सन्स या पेढीवर आवक झालेल्या पाच डझनाच्या पेटीस तब्बल 25 हजार रुपये भाव मिळाला. गेल्या वर्षी पहिल्या पेटीला 21 हजार रुपये भाव मिळाला.
रत्नागिरी हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा मार्चपासून सुरू होतो. त्यापूर्वी बाजारात हंगामपूर्व हापूस आंब्याची तुरळक आवक होते. रविवारी झालेली ही आवक हंगामपूर्व असून, मार्चपासून हंगाम सुरळीत सुरू होण्याचा अंदाज आडते वर्तवित आहेत.
कुमकेश्वर ता. देवगड जि. रत्नागिरी येथील शेतकरी रामभाऊ सावंत यांच्या बागेतून मार्केटयार्डात भोसले यांच्या फर्मवर हापूसची आवक झाली. बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले. ज्यांच्या गाळ्यावर आवक झाली, ते आडतदार अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, बाबासाहेब बिबवे, दत्तात्रय कळमकर, बाळासाहेब काेंडे, बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले, आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची, करण जाधव, रामदास गायकवाड, रवी कुल, अभिजित थोरात, महेश शिर्के, श्रीपाद अनपट, तात्या कोंडे, किरण ननावरे, तात्या पठारे, राजू भोले, बलराज भोसले, राजेश परदेशी यांच्यासह अनेक आडते उपस्थित होते.
मागील वर्षीपेक्षा यंदा रत्नागिरी हापूसची आवक लवकर झाली आहे. भावही जास्त मिळाला आहे. गेल्या वर्षी करोनामुळे आंब्याची आवक कमी झाली. भीतीमुळे नागरिक आंबा घरी नेण्यास घाबरत होते. मात्र, आता ती भीती कमी झाली आहे. नागरिक आता आंब्याची वाट पाहत असून, चव चाखण्यास उत्सुक आहेत.
– अनिरुद्ध भोसले, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड