पिंपरी (प्रतिनिधी) – अन्न धान्य वितरण आणि पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन देऊन कारभार पारदर्शीपणाने करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र हे मशीन 2-जी च्या गतीने धावत असल्याने त्यामध्ये अनेक त्रुटी आणि अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा, माहिती अद्ययावत करणे आदींमध्ये अडथळे येत आहेत. परिणामी नागरिकांना शिधा मिळत नसल्याने तक्रारींचा सूर उमटत आहे. फाइव्ह जीच्या युगात टू – जीने तेही गतीने काम करायचे कसे असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे शासनाच्या आणि दुकानदारांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसत आहे.
शहरात एकूण 320 स्वस्त धान्य दुकाने आहेत. दुकानाद्वारे धान्य पुरवठा करताना पारदर्शीपणा यावा. नागरिकांना पुरेसे धान्य मिळावे यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणाली सुरू केली. याद्वारे दुकानदारांना ई-पॉस मशीन देण्यात आल्या. या मशिनच्या माध्यमातून कुटुंबातील नागरिकांचे आधारकार्ड अद्ययावत करून अंगठ्यांचे ठसे घेतले. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाच्या सदस्य संख्येची नोंद करून धान्याचे वितरण सुरू करण्यात येऊ लागले आहे.
ई-पॉस मशीनच्या सॉफटवेअरमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप त्यामध्ये बदल झालेला नाही. 4 जीस अनुकूल सॉफटवेअर देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शिधापत्रिकाधारकांना सुविधा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेरप्राइस शॉपकिपर्स असोसिएशन.
नागरिकांनाही नंबर लिंक झाल्याने किती धान्य आले आहे याची माहिती मिळण्याची सुविधा देण्यात आली. मात्र तरीही काही ना काही त्रुटी काढून धान्य दुकानदार नागरिकांना पुरेसे धान्य देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर ई-पॉस मशीनमधील त्रुटींचे कारण दुकानदार सांगत आहेत.
शासनाने दिलेल्या ई-पॉस मशीनमध्ये 2 जीचीच सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगठ्यांचे ठसे उमटणे व पुढील प्रक्रियेला गती नाही. कामाला गती मिळत नाही. परिणामी धान्य वितरीत करताना अडचणी येत आहेत. शासनाने या मशीन अपडेट करुन द्यावेत, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. शासन आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मात्र धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. .