मुंबई, दि. 11 – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यामुळे फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासमोरील वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पहिल्यांदा झालेल्या फोन टॅपिंगच्या प्रकारात सात दिवस फोन टॅपिंग करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला.
संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे पोन टॅपिंग हे एसडीआयच्या स्वरूपात करण्यात आल्याची कबुली कुमार यांनी आपल्या जबाबात दिली आहे. संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला. तसेच एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच कुणा-कुणाचे फोन टॅप झाले होते, याची माहिती जाहीर केली होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अमजद खान नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितले होते.
रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केले होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली होती.