अहमदाबाद – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबई व सौराष्ट्र लढत अखेर अनिर्णित राहिली. या सामन्यात मुंबईला डावाने विजय मिळवण्याची संधी होती मात्र, जयदेव उनाडकट व चेतन सकारिया यांनी केलेल्या जिद्दी फलंदाजीमुळे मुंबईचा विजय हिरावून घेतला.
मुंबईने पहिला डाव 7 बाद 544 धावांवर घोषित केल्यावर सौराष्ट्रचा पहिला डाव 220 धावांत गुंडाळला व त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आणली. आपला दुसरा डाव सुरु केल्यावर मात्र, सौराष्ट्रच्या फलंदाजांनी नेटाने खेळ केला.
स्नेल पटेलने 98 तर, कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या चेतेश्वर पुजाराने 91 धावांची खेळी केली. त्यानंतरही त्यांचा डाव घसरला होता. मात्र, तळात जयदेव उनाडकटने नाबाद 32 तर, सकारियाने नाबाद 10 धावा करत मुंबईला निर्णायक विजयापासून वंचित ठेवले. मुंबईकडून शम्स मुलाणीने 7 गडी बाद केले मात्र, तो संघाचा विजय साकार करु शकला नाही.