पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यजमान महाराष्ट्र व झारखंड यांच्यातील सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. महाराष्ट्राच्या सहाशे धावांसमोर झारखंडने आपल्या दुसर्या डावात चौथ्या दिवसाचा खेळ थांबला व दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राहणार असल्याचे मान्य केले तेव्हा २ बाद १६७ धावा केल्या होत्या.
या सामन्यात रविवारच्या ४ बाद ५४३ धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर महाराष्ट्राने आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला. यावेळी महाराष्ट्राकडे तब्बल १९८ धावांची आघाडी होती व झारखंडसमोर डावाने पराभव होण्याचे संकेट उभे ठाकले होते. महाराष्ट्राचा शतकवीर फलंदाज अंकित बावणे १३१ धावांवर बाद झाला. काल २ धावांवर नाबाद असलेला अझीम काझी याच धावसंख्येवर दुखापतग्रस्त होऊन परतला. त्याच्या जागी आलेल्या निखिल नाईकने वेगवान ३२ धावांची खेळी केली व संघाला सहाशे धावांचा पल्ला पार करुन दिला. त्यानंतर कर्णधार केदार जाधवने महाराष्ट्राचा पहिला डाव घोषित केला.
१९८ धावांची पिछाडी घेऊन आपला दुसरा डाव सुरु केल्यावर झारखंडच्या कुमार सुरज व नजीम सिद्दीकी यांनी १३५ धावांची भक्कम सलामी दिली. सुरज शतकाकडे कूच करत असताना ७० धावांवर तर सिद्दीकी अर्धशतक पूर्ण केल्यावर ६१ धावांवर परतले. त्यावेळी महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, कुमार कुशाग्रा व कर्णधार विराट सिंगने दिवसातील उर्वरीत षटके खेळून काढली व सामना अनिर्णित राखला. कुशाग्राने नाबाद २७ तर विराटने नाबाद ४ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीर व हितेश वळुंज यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. या स्पर्धेत आतापर्यंतच्या दोन्ही लढतींत सरस गोलंदाजी करणारा महाराष्ट्राचा हितेश वळुंज या सामन्याचा मानकरी ठरला.
Ranji Trophy #MAHvJHA Stumps Day 3 : केदारच्या दीडशतकाने महाराष्ट्राला आघाडी…
संक्षिप्त धावफलक –
झारखंड पहिला डाव – सर्वबाद ४०३ धावा. महाराष्ट्र पहिला डाव – १४३ षटकांत ५ बाद ६०१ धावा घोषित. (केदार जाधव १८२, पवन शहा १३६, अंकित बावणे १३१, नौशाद शेख ७३, निखिल नाईक नाबाद २६, आशय पालकर नाबाद ६, शाहबाज नदीम २-१३९). झारखंड दुसरा डाव – ४५ षटकांत २ बाद १६७ धावा. कुमार सुरज ७०, नजीम सिद्दीकी ६१, कुमार कुशाग्रा नाबाद २६, विराट सिंग नाबाद ४, सिद्धेश वीर १-४१, हितेश वळुंज १-४७).