न्हावरे- शिरूरचे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सरदवाडी गावाला रांजणगाव एमआयडीसीकडून पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. याबाबत राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी काल (दि.०४) औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत.
त्यामुळे सरदवाडी गावाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असून,सरदवाडीकर ग्रामस्थांची अशुद्ध पाण्यापासून सुटका होणार आहे.औद्योगिक वसाहतीतून प्रक्रिया केल्यानंतर बाहेर येणारे दूषित पाणी सरदवाडी परिसरातील ओढे-नाले यांमध्ये येत असल्याने परिसरातील विहिरी व कुंपनलिका दूषित झाल्या होत्या. त्यामुळे सरदवाडी गाव व परिसरात अनेक दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता.त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनीही पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा.
अशी मागणी आमदार पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे आमदार ॲड.अशोक पवार यांनी तातडीने राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सरदवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व रांजणगाव एमआयडीसीने सरदवाडी गावाला पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करावा.अशी मागणी केली होती.त्यानुसार मंत्री अदिती तटकरे,आमदार पवार व औद्योगिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये बुधवारी (दि.०४) मुंबई येथील मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये मंत्री तटकरे यांनी औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांना सरदवाडी
गावाला रांजणगाव एमआयडीसीने शुद्ध पाणी पुरवठा करावा.अशा सूचना दिल्या.यावेळी मंत्री आदिती तटकरे,आमदार पवार, औद्योगिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे उपस्थित होते.