चेन्नई :- भारतीय बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार आर. प्रज्ञानंद याच्या कामगिरीमुळे सुरू झाला आहे. येणारी पिढी ही भारतीय बुद्धिबळासाठी सुवर्ण पिढी ठरेल, असा विश्वास भारताचा ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद याने व्यक्त केला आहे.
बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनलाही जेरीस आणले होते. जरी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरीही त्याच्या कामगिरीने जगाला आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळेच सध्याची पिढी ही भारतीय बुद्धिबळाची सुवर्ण पिढी आहे.
बहुतेक खेळाडूंचे एलो रेटिंग 2 हजार 700 पेक्षा जास्त आहे. विशेषत: 20 वर्षांखालील खेळाडू एवढी चांगली कामगिरी करत असल्याचे पाहून मलाही आश्चर्य वाटले. हे खेळाडू सुवर्ण पिढीतील आहेत.
हे सर्व खेळाडू 2 हजार 700 पेक्षाही जास्त एलो रेटिंगमध्ये सामील आहेत आणि ते सर्व 20 वर्षांखालील आहेत. हे सहसा घडत नाही, म्हणून ते खरोखरच खास खेळाडू आहेत, असेही आनंद म्हणाला.
जागतिक वर्चस्व मिळेल…
मी या सगळ्या खेळाडूंना भातीय बुद्धिबळाची सुवर्ण पिढी म्हणतो कारण ते पुढील 10 वर्षे अव्वल स्थानावर खेळत राहतील. त्यांच्या कारकिर्दीदत चढ-उतार निश्चितच येतील. मात्र, तरीही ते देशात या खेळाची लोकप्रियता वाढीसाठी अभूतपूर्व योगदान देतील. प्रज्ञानंदप्रमाणे अनेक असे खेळाडू आहेत की जे येत्या काळात जगात वर्चस्व सिद्ध करतील. नवोदित खेळाडूंकडेही क्षमता आहे, असा विश्वासही आनंद याने व्यक्त केला.