मध्य प्रदेशातील एका छोट्याशा खेड्यामध्ये जन्मलेल्या नितेश तिवारी यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईमधून मटेरियल सायन्समध्ये पदवी मिळवली. मात्र नंतर त्यांनी आपला मोर्चा सिनेइंडस्ट्रीकडे वळवला. 2011 मध्ये आलेल्या “चिल्लर पाटी’ या चित्रपटासाठी त्यांनी विकास बहलसोबत सहदिग्दर्शकाची भूमिका निभावली. सलमान खान आणि रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
पुढे नितेश तिवारीने “भूतनाथ रिटर्नस्’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी नितेश यांनी लियो बर्नेटसोबत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले होते. आमीर खान अभिनित “दंगल’ या गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्याची स्क्रिप्टही त्यांनीच लिहिली होती.
या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि नितेश यांना लोकप्रियता मिळवून दिली आणि बॉलीवूडमधील त्यांचे स्थानही पक्के झाले. आता नितेश तिवारी निर्माते मधु मंटेना यांच्यासोबत “रामायण’ या शीर्षकाखाली 400 कोटींचा मेगाबजेट चित्रपट बनवणार आहेत. पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात बीएफएक्स आणि व्हिज्युअल इफेक्टस्चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळेच या चित्रपटासाठी प्रचंड खर्च होणार आहे.