राजगुरूनगर – “माझं राजगुरूनगर स्वच्छ राजगुरूनगर’ या अंतर्गत कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात येत असून त्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन व नागरिकांना प्रशिक्षित केले जात आहे.
राजगुरूनगर नगरपरिषद नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप, स्वच्छता सभापती संपदा सांडभोर, नगरसेविका सारिका घुमटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पश्चिम भागातील विविध गृहनिर्माण सोसायटीमध्ये जनजागृती उपक्रम घेण्यात आला. या परिसरातील नगरितील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टर घंटागाडीला पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कारपे समन्वयक सुरेश घोरपडे व जितेंद्र भाले यांनी कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिक (डेमो) करून दाखवले. सुका व हानिकारक कचरा नागरिकांनी आपल्या घरातूनच वर्गीकरण करून देणे गरजेचे आहे. कचऱ्यामुळे मानवी जीवनास, वातावरणास हानी पोहोचून होणारे विविध आजार व निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नगरपरिषद शहर समन्वयक सतीश कांबळे, कारपे प्रतिनिधी सुरेश घोरपडे, जितेंद्र भाले, राहुल निकम, मल्हारी पंडित, रेश्मा ढावरे, पूजा पिंगळे, रोहिदास भगोरे यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- जानकीदेवी बजाज संस्था व कारपे संस्था औरंगाबाद शहरात शुन्य कचरा व्यवस्थापन अभियान उत्कृष्टरित्या राबवित आहे. शहरातील सर्व नागरिकांनी आपला कचरा आपली जबाबदारी असून तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करूनच घंटागाडीमध्ये द्यावा. आपला परिसर व आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यास सहकार्य करावे.
– सारिका घुमटकर, नगरसेविका, राजगुरूनगर