राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर शहरात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, शहरातील नागरिकांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर मोठे जन आंदोलन केले जाईल, अशा इशारा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे.
राजगुरूनगर शहरातील कचरा गोळा करून तो खेड पोलीस ठाण्याच्या मागिल बाजूस टाकण्यात येतो; मात्र आता सातकरस्थळ आणि राक्षेवाडी हद्दीतील कचरा येथे टाकण्यात येत असल्याचे कारपे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापी हा कचरा डुकरे अस्ताव्यस्त करीत असल्याने कचरा पोलीस ठाण्याच्या दारापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे दुर्गंधी ने पोलीस नागरिक हैराण झाले असून आरोग्यही धोक्यात आले आहे.
राजगुरूनगर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात पाणी आणि गटार योजनेचे काम सुरू आहे; मात्र हे काम करताना शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र राडारोडा आहे. शहरातील रस्ते कॉंक्रीटचे केले जाणार असल्याने ते तात्पुरते बुजवले आहेत त्यामुळे रस्त्यात लहान लहान दगड, मातीमोठ्या प्रमाणात आल्याने त्यावरून घसरून अनेकजण पडले आहेत. शहराला मोठ्या प्रमाणात बकालपणा आला आहे. अधिकारी नागरी समस्यांकडे लक्ष देत नाहीत रस्त्यांची चाळण झाली आहे. वास्तविक यासाठी मोठा निधी आला असल्याने तो वापरला न जात तो परस्पर लाटला जात असल्याचा आरोप विजय डोळस यांनी केला आहे.
खेड ठाण्यामागील कचरा डेपो स्थलांतरित करावा, शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, शहरातील पाणी व गटार योजनासाठी खोदकाम केलेले रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी खेड तालुका भीमशक्ती संघटनेने केली असून मागणीचे निवेदन देत उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे केली आहे.
नगरपरिषदेचा विजपुरवठा खंडीत
राजगुरूनगर शहरातील वीजपुरवठा वीज बिल न भरल्याने महावितरणने नगरपरिषदेचा वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे शहराचा काही भाग रात्री अंधारात राहत आहे. नगरपरिषदेने वीज बिल भरावे वीजपुरवठा सुरळीत करावा.