फलटण -फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचा दबदबा पुन्हा सिद्ध झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या 14 उमेदवारांचा मोठया फरकाने विजय झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनेलने या संपूर्ण निवडणुकीत 18 विरुद्ध शून्य असा विरोधकांचा पुरता धुव्वा उडवला आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर 18 पैकी चार उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून गेले होते. एकूण 18 जागांसाठी विरोधी गटाचे पूर्ण पॅनेल उभे राहिले नसताना ही निवडणूक पार पडली. परंतु यामध्ये काही उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याने विरोधकांचा जोर बाजार समितीमध्ये पाहण्यास मिळाला नाही. तालुक्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता निवडणुकीपुर्वीच निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यानुसारच बाजार समितीच्या निकालानंतर विरोधकांचा या निवडणुकीत टिकाव लागला नसल्याचे पहायला मिळाले. रामराजे, संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या राजेगटाने पुन्हा बाजार समितीवर आपली पकड कायम ठेवत 18 विरुद्ध शून्य ने सत्ता अबाधित ठेवली.
तालुक्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक असणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने बाजार समितीमध्ये कोणताही सक्रिय सहभाग घेतला नव्हता. सत्ताधारी राजे गटाच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या निवडणुकीत करण्यात आला होता. यामध्ये शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येऊन बाजार समितीची निवडणूक लढवली. पण, बाजार समितीच्या सत्तेत मात्र काही बदल झाला नाही.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी निकाल जाहीर केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, निवडणूक निरीक्षक तथा तहसीलदार समीर यादव यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अक्षय शामराव गायकवाड हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघामधून, निलेश सुरेश कापसे हमाल मापाडी मतदारसंघामधून, तुळशीदास दशरथ शिंदे सोसायटी इतर मागास मतदारसंघामधून, संतोष मल्हारी जगताप ग्रामपंचायत आर्थिक मागास मतदारसंघामधून यापुर्वीच बिनविरोध झाले होते.
विजयी उमेदवार आणि मिळालेली मते
सोसायटी मतदारसंघातून रघुनाथराजे नाईक निंबाळकर (1223 मते), चेतन सुभाष शिंदे (1233 मते), भगवान दादासो होळकर (1196 मते), शंभूराज विनायकराव पाटील (1198 मते), शरद लक्ष्मण लोखंडे (1238 मते), ज्ञानदेव बाबासो गावडे (1241 मते), दीपक विठोबा गौंड (1225 मते) हे विजयी झाले. महिला मतदारसंघातून सुनीता चंद्रकांत रणवरे (1251 मते), जयश्री गणपत सस्ते (1225 मते) याविजयी झाल्या. सोसायटी विजाभज मतदारसंघातून भीमराव पोपटराव खताळ (1160 मते) हे विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघातून किरण सयाजी शिंदे (817 मते), चांगदेव कृष्णा खरात (815 मते) हे विजयी झाले. व्यापारी व आडते मतदारसंघातून संजय हरिभाऊ कदम (68 मते), समर दिलीप जाधव (61 मते) हे विजयी झाले.
विनाकारण लादलेली निवडणूक
बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा विजय स्पष्ट होता. येथील कामाच्या जोरावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकून आम्हांला निवडून दिले आहे. खरंतर ही निवडणूक विनाकारण लादली गेली. विरोधकांकडे जिंकण्याची स्थिती नसताना ती लढवली गेली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पॅनेल उभे केले नसले तरी त्यांचा विरोधकांना छुपा पाठिंबा होता. राष्ट्रवादीला मतदान करु नका म्हणूनही त्यांच्याकडून फर्मान सुटले होते. पण, मतदारांनी त्यांना डावलले, अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.