मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. राज्यातील विविध मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याची तसेच मशिदींवरील भोंग्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य करुन महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेतून राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती ए. के. मेनन आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन कोर्टापुढे ही याचिका सादर करण्यात आली. या याचिकेची दाखल घेत न्यायालयाने लवकर तारीख निश्चित करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत.
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरोधात कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर भाषण देणे), कलम 116 (गुन्ह्यास उत्तेजन देणे) आणि 117 (10 हून अधिक लोकांनी केलेल्या गुन्ह्यास उत्तेजन देणे) या कलमांखाली भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हांची नोंद केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणाच्या वक्तव्याने समाजातील सर्व स्तरावर शांतता भंग झाली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणाऱ्या, प्रक्षोभक भाषणं करणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तूर्तास बंदी घालण्याची मागणीही याचिकेत केली आहे.