Raj thackeray – दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj thackeray) पत्रकार परिषद घेऊन टोल (Toll Issue) नाक्यासंदर्भातील आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला होता.
ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे. टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले चार दिवस उपोषणाला बसले होते.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 8 ऑक्टोबरला राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. यानंतर स्वतः राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधून या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना रोखठोक सवाल केला असल्याचं पाहायला मिळालं आहे. आज (दि. 10) राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.
यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील विविध ठिकाणच्या टोलच्या मुद्यावरून आपली सविस्तर भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, जनता रोड टॅक्स देते मग टोलचा भार कशाला असा, टोलची दरवाढ करण्यात आली आहे ती करू नये अशी मागणी करण्यात आली.
टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का? महिलांसाठी शौचालयं का नाही, असा सवालही त्यांनी केला. रस्त्यांची अवस्थादेखील चांगली नसल्याचा मुद्दाही या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला. टोल वसुलीच्या माध्यमातून युती सरकारच्या काळातील उड्डाणपूल आणि रस्ते बांधणीचा खर्च वसूल करण्यात येत आहे. मात्र, आता 2027 नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला.