मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे. करोनाच्या काळात हे अधिवेशन होत असल्याने त्या अनुषंगाने विविध उपाय योजण्यात येत असून सदस्यांसाठी बसण्याची नवी आसन पद्धतीही सभागृहात लागू केली जाणार आहे.
राज्यात करोनाची साथ सुरू झाल्यापासूनचे हे विधिमंडळाचे पहिलेच अधिवेशन असणार आहे. यात पुरवणी मागण्या आणि काही विधेयके सादर केली जाणार आहेत. विधिमंडळ कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. चर्चा किंवा लक्षवेधी प्रस्तावांनाही अनुमती असणार नाही.
करोनामुळे या आधी हे अधिवेशन दोन वेळा पुढे ढकलण्यात आले होते. या आधी हे अधिवेशन 22 जूनला होणार होते, त्यानंतर ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल असे जाहीर करण्यात आले होते. मार्च महिन्यात झालेले विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशनही करोनाच्या पार्श्वभूमीवर लवकर गुंडाळण्यात आले होते.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची करोना चाचणी अँटिजेन पद्धतीने केली जाणार आहे. सदस्यांना एक स्पेशल करोना किटही दिले जाईल, त्यात मास्क, फेस शिल्डपासून अन्यही अत्यावश्यक बाबींचा समावेश असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात सदस्यांच्या व्यक्तिगत सहायकास विधानभवन आवारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी आणि सदस्यांच्या गाडीच्या चालकासाठी पार्किंगमध्ये वेगळी व्यवस्था केली जाणार आहे.
राज्यातील निम्मे मंत्री मधल्या काळात करोनाग्रस्त झाले होते म्हणून या अधिवेशनासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यातील करोना स्थितीच्या हाताळणीचा विषय या अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.