बेंगळुरू – भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने थॉमस व उबेर करंडक स्पर्धेतून माघार घेतल्याने तिच्यावर टीका सुरू झाली होती. मात्र, आपण हा निर्णय करोनाच्या भीतीमुळे नव्हे तर वैयक्तिक कारणाने घेतल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.
ऑक्टोबर महिन्यात थॉमस व उबेर करंडक या जागतिक स्तरावरील मानाच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. दरवर्षी या स्पर्धा खेळण्यासाठी जागतिक स्तरावरील खेळाडू तयारी करत असतात. असे असतानाही सिंधूने माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. करोनाच्या धोक्यामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांत एकही स्पर्धा झालेली नसताना आता ही स्पर्धा होत असल्याने सर्व खेळाडू सहभागी होतील असे वाटत असताना सिंधूने माघारीचा निर्णय घेतल्याने संभ्रम निर्माण झाला होता.