भुतवडा तलाव अद्याप कोरडाच शहरासह तालुका अजूनही टॅंकरवरच
जामखेड – राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असताना जामखेड तालुक्यात अजूनही पावसाने ओढ दिल्याने जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात अद्याप कोरडाच आहे. यामुळे या भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून पिके धोक्यात आली आहेत.
जामखेड शहरासह आजपासच्या वाड्यावस्त्यांना भुतवडा तलावातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. मागील 10 ते 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या तलावात पाणी साचेल. अशी अपेक्षा होती, मात्र या तलावात एक फुटही पाणी आले नाही.त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्यात तलावातील गाळ काढण्याचे काम भारतीय जैन संघटना व बारामती ऍग्रोतर्फे करण्यात आले होते.
भुतवडा तलावात रामेश्वर (सौताडा) परिसरातील डोंगराळ भागातून पावसाचे पाणी येते. मात्र ऑगस्टच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस झाला नसल्याने हा तलाव कोरडा आहे. गेल्या वर्षीही अत्यल्प पाऊस झाल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात पाणी आले नसल्याने शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातही बारामती ऍग्रो व नगरपालिकेने 21 प्रभागात टॅंकर सुरु केले आहे. मात्र सर्वच प्रभागात टॅंकर जात नाही. त्यामुळे नागरिकांनी जारला पसंती देत 20 लिटरच्या पाण्याचा ‘जार’ची विक्री तेजीत होत आहे.
त्यासाठी 30 रुपये मोजण्याची मानसिकताही जामखेडकरांची आता नाइलाजाने तयार झालेली आहे. काही प्रभागात नागरपरिषदेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठाच होत नसल्याने शहरातील नागरिकांवर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. दिवसाला दोन जर म्हटलं तरी महिन्याला 1200 रुपये निव्वळ पिण्याच्या पाण्यावर खर्च होत आहेत.शहरात मात्र बाटलीबंद व जारचा व्यवसाय तेजीत आहे. तहान भागवण्यासाठी बंद बाटलीतील थंड पाणी पिण्याकडे अनेकांचा वाढता कल आहे.