सातगाव पठारातील बटाटा शेतातच सडला
मंचर (पुणे) – बटाट्याचे आगार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरातील पेठ, पारगाव, कुरवंडी, कोल्हारवाडी, थूगाव, भावडी, कारेगाव या गावांमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतात काढून ठेवलेले बटाटे पावसाच्या पाण्याने सडू लागले. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सातगाव पठार भागातील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब सावंत पाटील यांनी केले आहे.
येथील शेतकऱ्यांचे वार्षिक उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे बटाट्याचे पीक आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी बटाट्याची पीक घेतले होते. एकरी 70 ते 80 हजार खर्च आला; परंतु यावर्षी मोठ्या स्वरूपात सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेले बटाट्याचे पीक सडून गेले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी व पंचनामे करावेत अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, बीडीओ जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मनोज कोल्हे यांनी प्रत्यक्ष येऊन या परिसरातील सडलेल्या बटाट्याच्या पिकाची पाहणी केली.
यावेळी बटाटा उत्पादक व सातगाव पठार पाणी योजनेचे अध्यक्ष राम तोडकर, भीमाशंकर कोल स्टोरेजचे भाऊसाहेब सावंत, किरण कुदळे, सुधाकर पवळे, बाळासाहेब मानकर उपस्थित होते. जिल्हा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने पावसामुळे सडलेल्या बटाटा पिकाची पाहणी करून पथक माघारी परतताच पुन्हा सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. बटाटा काढणी चालू असताना झालेल्या पावसाच्या पुराने बटाटा वाहून गेला, असे सांगून उद्योजक रमेश सावंत पाटील म्हणाले, सातगाव पठार परिसर हा दुष्काळी आहे. येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
येथे बटाटा, ज्वारी व वाटाणा ही पिके घेतली जातात. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसताना व्याजाने पैसे काढून त्यांनी बटाटा लागवड केली होती. तर काही शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवून बटाट्याचा खर्च भागवला. अनेकांनी व्यापाऱ्याकडून उधारीवर बटाटा बियाणे घेऊन लागवड केली. अशा परिस्थितीत बटाट्याचे संपूर्ण पीक हातातून गेल्याने उत्पन्न तर नाहीच नाही. परंतु भांडवली खर्चही भागत नाही. त्यामुळे कुटुंबाचा वार्षिक खर्च कसा करायचा? हा प्रश्न येथील शेतकऱ्यांचा उभा आहे.
- बियाणे, रासायनिक खते, तसेच कोंबडी खत, शेणखत, लागवड, औषध फवारणी खर्च हा खर्च त्यामध्ये करावा लागतो. असा खर्च करून ऐन काढणीला आलेल्या बटाट्याचे पीक हातातून गेले आहे. पंचनामे करून लगेच हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये भरपाई द्यावी.
-अशोकराव बाजारे, प्रगतशील शेतकरी सातगाव पठार